नवी दिल्ली : देशात वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यानंतर त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. दुरंतो आणि शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत वंदे भारत ट्रेन देशात विविध मार्गावरुन वेगाने धावत आहे. परंतु, या रेल्वेवर दगडफेकीचे प्रकार वाढत आहेत.
काही समाजविरोधी घटक वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करत आहेत. दगडफेक करुन उपद्रवी फरार होऊन जातात. आता चेन्नई-तिरुनेलवेली वंदे भारत एक्सप्रेसवर काही लोकांनी दगडफेक केली. चेन्नई एग्मोर स्टेशनवरुन ही ट्रेन रविवारी रात्री दहा वाजता निघाली. त्यानंतर गंगईकोंदन आणि नारीकीनारू स्टेशनमध्ये तिच्यावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत ६ कोचचे नुकसान झाले. तसेच रेल्वेतून प्रवास करणारे लोकही दहशतीखाली आले.
तिरुनेलवेली रेल्वे स्टेशनमध्ये या दगडफेक प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणानंतर रेल्वे पोलिसांनी जीआरपीला अलर्ट राहण्याचे सांगितले आहे. अजूनपर्यंत दगडफेक करणा-यांचा शोध रेल्वे पोलिसांना घेता आला नाही. काही जणांकडून मद्य आणि गांजाच्या नशेत ही दगडफेक झाल्याची शक्यता आहे. आता पोलीस यासंदर्भात विविध रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत. परंतु या प्रकारामुळे प्रवाशी घाबरले आहेत.
मेक इन इंडिया ट्रेन
वंदे भारत एक्सप्रेस सेमी हायस्पीड असलेली ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन समजली जात आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ही रेल्वे तयार करण्यात आली. महाराष्ट्रात आणखी सात मार्गावर या वर्षी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. मुंबई-अहमदाबाद, मुंबई-शेगाव, पुणे -शेगाव, पुणे-बेळगाव, पुणे-बडोदा, पुणे-सिकंदराबाद, मुंबई-कोल्हापूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस या वर्षी सुरु करण्यात येणार आहे.