नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे.
पीएम मोदींनी लिहिले की, देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले जात आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतक-यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले होते.
पीएम मोदी म्हणाले की, ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत किंवा देशाचे गृहमंत्री असोत आणि आमदार म्हणूनही चौधरी चरणसिंह यांनी नेहमीच राष्ट्र उभारणीला चालना दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. कृषितज्ज्ञ स्वामीनाथन यांच्याबद्दल देखील पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट केली आहे. भारत सरकार डॉ. एमएस स्वामीनाथन यांना आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले.
एक नवोदित आणि मार्गदर्शक आणि अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे त्यांचे अमूल्य कार्याची आपल्याला जाण आहे. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचाच कायापालट केला नाही तर देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली. ते मला जवळून ओळखत असत आणि मी नेहमी त्यांचा सल्ला मोलाचा मानत आलो आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.