गंगाखेड : या युगामध्ये भारतीय लोक आपली संस्कृती विसरत आहेत. पाश्चीमात्य संस्कृतीचा अवलंब करत आहेत. विश्वामध्ये भारतीय संस्कृती ही सर्वोच्च असून ही संस्कृती टिकवण्यासाठी सध्याच्या बालकांना संस्कार देण्यासाठी वेदाचे अध्ययन आणि अध्यापन करणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन यज्ञ महर्षी प.पू.यज्ञेश्वर सेलूकर महाराज यांनी यज्ञभूमीत सामूहिक बटो सोहळ्याप्रसंगी शुभ आशीर्वाद देताना केले.
गेल्या ७० वर्षाच्या परंपरेनुसार येथे यज्ञ भूमीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील उपनयन संस्कार सामूहिक सोहळा पार पडत असतो. आज दि.१९ शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ४१ बटूंचा उपनयन संस्कार सोहळा पार पाडला. यज्ञ भूमी येथे सकाळी १० वाजता उपनयन संस्कार सोहळा हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी उपनयन संस्कार अग्निहोत्री सुधाकर शास्त्री महाराज, शुभम पुराणिक आणि वेद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मंत्रउच्चारामध्ये सोहळा पार पडला.
उपनयन संस्कार म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून बालकांनी भविष्यात आपले जीवन नियमबद्ध पद्धतीने जगण्यासाठी केलेला हा उपदेश आहे. त्यासाठी हिंदू धर्मातील सर्व पालकांनी आपले पाल्याना इतर शिक्षणासोबत वेद अध्ययनाचे धडे द्यावेत. वेद अध्ययन आणि अध्यापन केले तरच आपल्या धर्माचे रक्षण होईल अन्यथा आपला धर्म संस्कारापासून दूर जाईल. उपनय संस्काराच्या नंतर सर्व बटूंना यज्ञ सेवा समितीच्या वतीने रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ वाटप करण्यात आले. तसेच शरद दलाल व सौ क्रांती दलाल परिवाराच्या वतीने बटूंना ब्लँकेट वाटप अग्निहोत्री सुधाकर महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ब्राह्मण समाजाचे प्रदेश प्रवक्ते संजय सुपेकर, नगरसेवक तथा शिक्षक नेते बाळासाहेब राखे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी यज्ञभूमी सेवा समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि स्थानिक ब्राह्मण समाजाचे पदाधिकारी युवक महिलांनी यांनी परिश्रम घेतले.