सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा येथील वर्धनगडावर स्वच्छता मोहिम राबवून सोलापुरातील इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी शिवरायांना आगळ्यावेगळ्या पध्दतीने अभिवादन केले. यासोबतच शिवकालीन कारागृह असलेल्या वासोटा किल्ल्यावर भटकंती केली. या उपक्रमात ७५ हून अधिक निसर्गप्रेमींनी सहभाग नोंदविला.
शिवजयंतीनिमित्त इको फ्रेंडली क्लबच्यावतीने वासोटा जंगल आणि वर्धनगड येथे भटकंतीचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.सकाळी इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांचा जथ्था सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला परिसरात पोचला. तासभर बोटींग करुन सर्वजण वोसाटा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या वन विभागाच्या चेक पॉईंटवर पोचले. वन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन जंगल भटकंतीला सुरुवात झाली.
घनदाट जंगलातील पायवाटेने निसर्गाचा आनंद घेत सर्वजण दोन तासात वासोटा किल्ल्यावर पोचले. उंचावरुन दिसणारा शिवसागर जलाशय, व्याघ्रगड, कोयना अभयारण्य परिसर निसर्ग किती अफाट आहे हेच दाखवून देत होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. भारत माता की जय.. शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय.. आदी घोषणा देवून सर्वांनी आपला आनंद व्यक्त केला. वनभोजनानंतर गडफेरीला सुरुवात झाली. किल्लेदाराचा वाडा, मारुती मंदिर, चुन्याचा घाणा, पाण्याचे टाके, बाबू कडा, शिवमंदिर आदी ठिकाणांना इको फ्रेंडली क्लबच्या सदस्यांनी भेट दिली. बाबू कडा येथील इको पॉईंटवर छत्रपती शिवाजी महाराज की जय.. यासह विविध घोषणा देवून घुमणार्या आवाजाचा अनुभव घेतला.
तासाभराच्या भटकंतीनंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. जंगल वाटेनेच खाली आल्यानंतर बोटींग करत सर्वजण शेंबडी गावात पोचले. आरोही टेंट हाऊसमध्ये रात्रीच्या मुक्कामाची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.