चिपळूण : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला होता. या मेळाव्यापूर्वी भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिले होते.
मला तुमच्याशी काही बोलायचं, अशी भावनिक साद भास्कर जाधव यांनी घातली होती. मनातील खंत उघड करण्यासाठी आणि मनातील बोलण्यासाठी आपण येणार असल्याचे म्हटले होते. या भावनिक पत्रानंतर रविवारी मुलगा विक्रांत जाधव यांच्या भाषणा दरम्यान भास्कर जाधव यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांचा मुलगा विक्रांत जाधव यांनी विरोधकांना धडकी भरवणारे आक्रमक भाषण करत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
विक्रांत जाधव म्हणाले की, भास्कर जाधव इतके हलके नाहीत की कोणी धक्का लावल्यामुळे ते पडतील. त्यांनी भल्या भल्या लोकांना धक्का लावला आहे. कोणी आपल्याकडे येतो, काही सभा घेतो आणि वाटेल ते साहेबांवर बोलतो. तेव्हा आपण का गप्प बसतो. आपण गप्प बसायला नको. त्यांना उत्तर दिले पाहिजे.
आता तुम्ही सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. त्यानंतर त्यांची ही टिवटिव बंद होईल. आज तुम्ही सर्वांनी साहेबांना सांगितले पाहिजे, साहेब काही जरी झाले तरी आम्ही तुमचे कडे बनून तुमच्यासोबत राहू. हे सांगण्यासाठी तुम्हाला सर्वांना बोलवले. येत्या काळात जेव्हा वेळ पडेल तेव्हा ठाम उभे राहिले पाहिजे. तुमच्यासोबत दोन पावले मीही पुढे राहीन, हे भास्कर जाधव यांचा पुत्र म्हणून तुम्हाला खात्री देतो, असे विक्रम जाधव यांनी सांगितले.