मुंबई : . उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांनी रविवारी सायंकाळी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे आदल्याच दिवशी गोरेगाव येथे उद्धव ठाकरेंचे रवींद्र वायकर यांनी स्वागत केले होते. दुस-या दिवशीच त्यांचे पक्षांतर झाले. हा पक्षप्रवेश होण्याआधी मुंबई महापालिकेने त्यांच्याविरोधातील आरोप मागे घेतले. रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रवींद्र वायकर आता वाशिंग मशीनमध्ये गेले आहेत. अशी प्रतिक्रिया दिली आहे.
रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर मला विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय वाटते?, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय वाटते?, हे जाणून घ्या, असं संजय राऊत पत्रकारांना म्हणाले. मुख्य म्हणजे जे रवींद्र वायकारांना तुरुंगात टाकणार होते, त्यांनी सातत्याने रवींद्र वायकर यांच्यावर आरोप केले, ज्यांनी सातत्याने ईडीकडे तक्रारी केल्या, ते पक्षप्रवेशानंतर मुलुंडच्या घरात आतून कडी लावून बसलेले आहे. त्यांना बाहेर काढा आधी आणि त्यांचे मत घ्या, अशी टीकाही संजय राऊतांनी नाव न घेता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर केली.
रवींद्र वायकर आता वाशिंग मशीनमध्ये गेले आहेत. आमच्याकडे असताना आरोप करायचे, गुन्हे दाखल करायचे, अटकेच्या धमक्या द्यायच्या, कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपोटी एखादा माणूस त्या पक्षात गेला की, तो स्वच्छ होतो, पवित्र होतो. रवींद्र वायकरांचेही तसेच झाले आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. शेवटी माणसाने हिंमत दाखवायची असते. लढायच्या वेळेला पळून जाणारे यांची नोंद इतिहासात होत नाही. रवींद्र वायकर यांच्या प्रवेशामुळे भाजपाचीच नाचक्की झाली आहे, असे संजय राऊतांनी यावेळी सांगितले.