नवी दिल्ली : एससीबीएचे अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील अधीष अग्रवाल यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले असून अधीष अग्रवाल यांनी सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांसंदर्भात दिलेल्या निकालावर आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी आधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याना पत्र लिहिले होते. त्यानंतर त्यांनी देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना देखील पत्र लिहिले होते.सरन्यायाधीश म्हणालेत की, तुम्ही आम्हाला निवडणूक रोख्यांसंदर्भात घेतलेल्या निकालाचा पुनर्विचार करण्यास सांगत आहात. हे सर्व काही प्रसिद्धसाठी सुरु असल्याचे आम्हाला दिसत आहे. त्यामुळे यात लक्ष घालावे असे आम्हाला वाटत नाही.
तुम्ही एक वरिष्ठ वकील आणि एससीबीएचे अध्यक्ष आहात. तुम्ही पत्र लिहून माझ्या सू मोटोच्या अधिकारांना आव्हान दिले आहे. हे सर्व प्रसिद्धीसाठी सुरु आहे. त्यामुळे आम्ही यात लक्ष घालणार नाही. मला आणखी काही बोलायला लावू नका. कारण, ते सन्मानजनक नसेल असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अग्रवाल यांना म्हटले आहे. अधीष अग्रवाल यांनी यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले होते. सुप्रीम कोर्टाचा निवडणूक रोख्यांसंदर्भात देण्यात आलेला निर्णय अयोग्य आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला लागू न करण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी अग्रवाल यांनी राष्ट्रपतींकडे केली होती. त्यांची ही मागणी मुर्मू यांनी स्पष्ट शब्दांत नाकारली होती. तसेच, अग्रवाल यांच्या विचारांवर टीका केली होती सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांना कमकूवत करण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
निवडणूक रोखे असंविधानिक
सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारीला ऐतिहासिक निर्णय दिला होता. यात २०१८ मध्ये मोदी सरकारने आणलेल्या निवडणूक रोख्यांना सुप्रीम कोर्टाने असंविधानिक ठरवले होते. शिवाय, निवडणूक आयोगाला निवडणूक रोख्यांसंदर्भातील सर्व माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने रोख्यांसंदर्भातील माहिती आपल्या वेबसाईटवर अपलोड केली आहे.