धाराशिव : महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणत्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे यावरून खलबते सुरू आहेत. तर, अनेक ठिकाणी जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. मराठा समाज प्रत्येक गावातून २ उमेदवार उभे करणार आहे. मराठा समाजाकडून १ हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणा-या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.
धाराशिवमधील लोकसभेची निवडणूक प्रशासनासाठीच आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये मराठा समाजाकडून १ हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. प्रत्येक गावातून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या उमेदवारांच्या अनामत रकमेसाठी प्रत्येक मराठा कुटुंबाकडून १०० रुपये देणगी दिली जाणार आहे. आतापर्यंत ५० जणांची उमेदवारी निश्चितही करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत २४ मार्चला अंतरवाली सराटीत बैठक होईल. त्यात उमेदवारांबाबत पुढील दिशा ठरवली जाईल. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.