नवी दिल्ली : भारताची स्टार बॅडमिंटनपटूंची जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची यशस्वी घौडदौड सुरू असून आता त्यांनी आणखी एक मोठा विक्रम केला आहे. त्यांनी सायना नेहवालचा विक्रम मोडला आहे.
सात्विक साईराज आणि चिराग यांची जोडी पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आहे. त्यांनी अव्वल क्रमांकावर गेले १० आठवडे आपले स्थान कायम राखले आहे.
त्यामुळे सात्विक आणि चिराग पहिलेच भारतीय बॅडमिंटनपटू ठरले आहेत, ज्यांनी १० आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. यापूर्वी सायना नेहवालने १८ ऑगस्ट ते २१ ऑक्टोबर २०१५ दरम्यान सलग ९ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक टिकवला होता.
विशेष म्हणजे सात्विक आणि चिराग ही पहिली भारतीय पुरुष बॅडमिंटन जोडी आहे, ज्यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सध्या सात्विक आणि चिराग यांचे १,०२,३०३ पाँइंट्स आहेत. त्यांच्यात आणि दुस-या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या कँग मिन आणि सेओ सेउंग जे या जोडीमध्ये ५००० पाँइंट्सचा फरक आहे.
सात्विक साईराज आणि चिराग यांनी गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या स्पर्धा जिंकून भारताचा तिरंगा मानाने फडकावला आहे. त्यांनी इंडिया ओपन २०२२ स्पर्धा जिंकल्यानंतर कामगिरीत सातत्य ठेवले आहे. त्यांनी भारताला ऐतिहासिक थॉमस कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
तसेच त्यांनी राष्ट्रकूल स्पर्धेत, आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय देखील त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या. त्यांनी नुकतेच फ्रेंच ओपन २०२४ स्पर्धेचेही विजेतेपद जिंकले. तसेच यंदाच्या वर्षात त्यांनी आत्तापर्यंत तीनवेळा अंतिम फेरीतही स्थान मिळवले. त्यांना भारत सरकारकडून यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारही जाहीर झाला होता.