लातूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये क्षेत्रीय अधिकारी यांची जबाबदारी महत्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे वाचन करून आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी. यामध्ये कुचराई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित लातूर ग्रामीण मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी आणि मास्टर ट्रेनर्स यांच्या प्रशिक्षणामध्ये जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. प्र. अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रियांका आयरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. रावलोड यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी, मास्टर ट्रेनर्स यावेळी उपस्थित होते.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी गांभीर्याने आणि काळजीपूर्वक पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे आणि नियमांचे वाचन करावे. आपल्या कामामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, तसेच आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे नियमबा वर्तन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. यावेळी उपस्थित क्षेत्रीय अधिकारी यांना मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या जबाबदा-यांची माहिती देण्यात आली. तसेच ईव्हीएम मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशापद्धतीने होणार आहे, याबाबत डेमो दाखविण्यात आला. प्रशिक्षणानंतर सर्व क्षेत्रीय अधिकारी, मास्टर ट्रेनर्स यांची १०० गुणांची परीक्षा घेण्यात आली असून यामध्ये पात्र न ठरलेल्या क्षेत्रीय अधिका-यांचे पुन्हा प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आयरे यांनी सांगितले.