नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी ९ उमेदवारांची घोषणा केली. आतापर्यंत पक्षाने ४२४ उमेदवारांची घोषणा केली आहे. अद्याप पाच राज्यांमधील १९ मतदारसंघांसाठी नावे निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
भाजप नेतृत्वाला या १९ जागांसाठी उमेदवार निवडण्यात जास्त वेळ लागत आहे. कारण, मित्रपक्षांकडून या जागा हिसकावून घेण्याचा भाजपचा निर्धार दिसून येत आहे. या १९ जागांपैकी दोन उत्तर प्रदेशातील (रायबरेली आणि कैसरगंज), सहा जागा महाराष्ट्रात, सात जागा पंजाबमध्ये आणि प्रत्येकी एक जागा जम्मू-काश्मीर (पुंछ-राजौरी-अनंतनाग) आणि पश्चिम बंगाल (डायमंड हार्बर) या आहेत.
भाजप ५४३ पैकी ४४३ ते ४४४ जागा लढवणार आहे आणि मित्रपक्षांसाठी जवळपास १०० जागा सोडणार आहे. दोन वेळा खासदार राहिलेले आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी प्रतिनिधित्व केलेली पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर जागा हिसकावून घेण्यासाठी भाजप नेतृत्वाच्या हालचाली सुरू आहेत.
जम्मू- काश्मिरात भाजपने २ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत आणि ते अनंतनागमधून स्वत:चा उमेदवार उभा करू शकतात, तर इतर दोन जागा सोडू शकतात.
रायबरेलीच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होण्याची भाजप वाट पाहत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव करण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद लावेल. कैसरगंजमध्ये भाजप कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण स्ािंह यांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला उमेदवारी मिळू शकते.
महाराष्ट्रात आणखी ६ उमेदवार
महाराष्ट्रात भाजपने २४ नावांची घोषणा केली आणि आणखी ६ उमेदवार ते उभे करू शकतात. पंजाबमध्ये भाजपने ६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित सात जागांसाठी पुढील आठवड्यात नावे जाहीर केली जातील.