छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटला असून, वैजापूर येथे पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या १०२ गावांतील शेतक-यांनी शनिवारी जलसमाधीचा इशारा दिला होता. त्यानुसार शेतकरी जलसमाधीसाठी निघाले होते. त्यावेळी शेकडो शेतक-यांना पोलिसांनी गवंडगाव येथील टोलनाक्यावर अडवले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. यावेळी प्रचंड तणाव वाढला. परंतु सर्वच शेतक-यांना ताब्यात घेऊन येवला तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
नगर आणि निफाड तालुक्यांतील गावांसाठी नाशिक जिल्ह्यातील दारणा, भावली, मुकणे आणि भाम धरणातून नांदूर मधमेश्वर धरणात पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. या पाण्यातून आम्हालाही पाण्याचे आवर्तन मिळावे, अशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शेतक-यांची मागणी आहे. उन्हाळी आवर्तनाची मागणी करूनही पाणी न सोडल्याने दोनशेहून अधिक शेतक-यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
३ मेपासून वैजापूर येथील पाटबंधारे कार्यालयाच्या समोर वैजापूर आणि गंगापूर तालुक्यातील १०२ गावांतील शेतकरी उपोषणासाठी बसले होते. ११ टीएमसी पाणी आरक्षित असूनसुद्धा नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात न आल्याने हे उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषण करणा-या शेतक-यांनी शनिवारी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. आज शेतकरी जलसमाधी घेण्यासाठी धरणाकडे निघाले असता त्यांना पोलिसांनी अडवले आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला नेले. त्यामुळे अनर्थ टळला.