बीड : मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे. अशातच आता मुंडे भाऊ-बहीण आपणाला धमकावत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगेच्या या आरोपावर बोलताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर बोलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी दोन ते तीनवेळा हिणवल्यामुळे माझा नाईलाज झाला. त्यांनी सोशल मीडियावर लिहा, त्याला धमक्या द्या, मारुण टाका असं सांगितलं. शिवाय त्याला पण बीडमध्ये यायचे आहे, असं म्हणाल्या, ही त्यांनी मला धमकीच दिली की, मला बीडला येऊ देणार नाही. परंतु मला धमकी देऊ नका आणि असली स्वप्न बघू नका खूप जड जाईल, असं म्हणत जरांगेंनी पंकजा मुंडेंना इशाराच दिला.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, कोणीतरी बोलतं म्हणून त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. मला यावर काही बोलायचं नाही, मी माझ्या २२ वर्षाच्या राजकीय जीवनात एका पद्धतीने राजकारण केलं, काम केलं आहे. ५ वर्षे मी माझ्या जिल्हाचं पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. अचानक कोणीतरी येऊन अशी टिप्पणी करत असलं तर त्यावर बोलण्याची गरज नाही, असं मुंडे म्हणाल्या. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडले तरीही मुंडे विरुद्ध जरांगे हा वाद संपल्याचे दिसत नाही.