लातूर : प्रतिनिधी
इयत्ता बारावीनंतर उच्चशिक्षण घेणा-या राज्यभरातील २० लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून आता मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यात अभियांत्रिकी, मेडिकल, फार्मसीसह तब्बल ६४२ कोर्सेसचा समावेश आहे. त्यासाठी राज्य शासन दरवर्षी १८०० कोटी रुपयांचा भार उचलणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) होणार आहे.
राज्यातील उच्चशिक्षण घेणा-या जवळपास २० लाख मुलींना ६४२ कोर्सेस पूर्णपणे मोफत शिकण्याची संधी मिळणार आहे. या कोर्सेसची अर्धी फी सध्या शासनाच्या माध्यमातून भरली जाते, पण आता संपूर्ण शुल्क राज्य शासनच भरणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत झाला आहे. आता कॅबिनेटमध्ये त्यावर अंतिम निर्णय होणार आहे. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी होईल.
अंदाजे उच्च महाविद्यालये – ५,३००
उच्चशिक्षण घेणा-या मुली – २० लाख
निर्णयातील कोर्सेस – ६४२
शैक्षणिक शुल्काची रक्कम – १८०० कोटी