छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पूर्वमशागती वेगात सुरू आहेत. पूर्वमोसमी पाऊस लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मागील दोन वर्षांप्रमाणे या वर्षीही कापूस आणि सोयाबीन लागवडीकडे शेतक-यांचा कल आहे.
यंदा पाऊस लवकर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगामातील पेरणी जूनच्या दुस-या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीपाचे सहा लाख ७५ लाख हेक्टर क्षेत्र असून, प्रत्यक्ष पेरणी सहा लाख ७१ हजार हेक्टरवर होते. दर वर्षीप्रमाणे शेतक-यांचा कल कापूस, मका, सोयाबीन या पिकांकडे अधिक आहे. पेरणी करण्यासाठी पूर्वमशागतीला वेग आला आहे. जिल्ह्यातील शेतकरी नांगरणी, वखरणी करून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
यंदा कापसाचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. मका, बाजरी, मूग, तूर आणि सोयाबीन या पिकांचे क्षेत्र त्या खालोखाल असणार आहे. मागील दोन वर्षे कापसाला पुरेसा बाजारभाव मिळाला नाही. या वर्षी चांगले उत्पन्न मिळण्याची शेतक-्यांनी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतक-यांचा कल कापूस आणि सोयाबीन पिकांकडे असल्याचे दिसत आहे.
यंदा खरीप हंगामात ३९ हजार २६४ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून, पिकनिहाय मागणी व उपलब्धता नोंदविण्यात आली आहे. खरीप हंगामात सर्व बियाणे उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बियाणे वितरक ते विक्रेते या स्तरावर वितरण सुरू असून बियाणे शेतक-यांना लवकरच उपलब्ध होणार आहे.