महाड : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये दाखल झाले आहेत.
मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता. त्यासाठीच आज (बुधवार) दुपारी ते महाडमध्ये दाखल झाले असून येथील चवदार तळ्याजवळ त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले आहे. चवदार तळ्याजवळ जाण्यापूर्वी आव्हाड यांनी टिपणीसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नुकताच तिसरी ते बारावी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावा, अशी शिफारस केली आहे. त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक शिकवले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
त्यावरून विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संभाजी ब्रिगेडकडून मनुस्मृतीचे श्लोक शिकवण्यास विरोध केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला होता. तर अजित पवार गटाचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आमच्या विचारधारेला हे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते.