पाटणा : बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत उष्णतेने तांडव केले असून, ५० हून अधिक विद्यार्थिनी उष्णतेमुळे बेशुद्ध झाले आहेत. विद्याथ्याची प्रकृती खालावल्याने शाळेत एकच गोंधळ उडाला. बेशुद्ध झालेल्या विद्यार्थिनींना रुग्णालयात नेण्यासाठी आरोग्य विभागाला पाचारण करण्यात आले. बराच वेळ रुग्णवाहिका न आल्याने सर्व विद्यार्थिनींना खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला.
बिहारमध्ये उष्णतेने कहर केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचले आहे. कडक उन्हात राज्यातील शाळा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी उष्णतेमुळे अरियारी ब्लॉकच्या मनकौल मिडल स्कूलमध्ये ही घटना घडली. या घटनेबाबत शाळेचे मुख्याध्यापक सुरेश प्रसाद यांनी सांगितले की, मुले वर्गात शिकत असताना आठवीच्या वर्गातील रागिणी, काजल, स्नेहा, जुली कुमारी यांच्यासह ५० हून अधिक मुली एकामागून एक बेशुद्ध पडू लागल्या. मुली बेशुद्ध झाल्याने शाळेत गोंधळ उडाला. शिक्षक आणि कर्मचा-यांनी पंखा लावून त्यांना इलेक्ट्रोलाईट मिश्रित पाणी दिले. यानंतर मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बिहारमधील ५ शहरांचे तापमान ४५ अंशांच्या वर
बिहारमध्ये सध्या उष्णता शिगेला पोहोचली आहे. अनेक शहरे उष्णतेने होरपळत आहेत. राज्यातील ५ शहरांतील तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादचे तापमान ४७.७ अंश, देहरी ४७ अंश, अरवल ४६.९ अंश, गया ४६.८ अंश आणि बक्सर ४६.४ अंश इतके नोंदविले गेले. तर राजधानी पाटणाचे तापमान ४२.८ अंश होते.