लातूर : प्रतिनिधी
दीड महिण्याच्या प्रतिक्षेनंतर शाळा उघडत असल्याने शाळा व्यवस्थापनाने शाळा व शाळेच्या परिसराची स्वच्छता शाळेत रांगोळी काढून, फूगे लावून शाळा सजवल्या होत्या. शाळेची घंटा वाजताच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करत शाळा स्तरावर शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या बरोबरच ‘माझं लातूर, हरित लातूर’ उपक्रमातून वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिले पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रमही राबवण्यात आला.
उन्हाळयाच्या जवळपास दीड महिण्याच्या प्रतिदिर्घ सुट्टयानंतर (दि. २ मे ते १४ जून) विद्यार्थ्यांच्या नविन शैक्षणिक वर्षांची सुरूवात झाली आहे. शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापनाने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शाळेची घंटा वाजताच विद्यार्थ्यांची होणारी धावपळ दिसून आली. यावर्षी शाळेत पहिल्यांदाच प्रवेशीत होणारे विद्यार्थी मात्र कावरे….बावरे होत शाळेत दाखल झाले. कांही विद्यार्थी पालकांच्या सोबत शाळेत आले मात्र पालक निघताच ते ही घरी परत निघण्यासाठी रडताना दिसून आले. पालकांची या विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी दमछाक झाल्याचे दिसून आले.
या वर्षी नविन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी १५ ते १६ हजार विद्यार्थी नव्याने प्रवेशीत होत आहेत. शिक्षण विभागाच्या सुचने नुसार अनेक अधिका-यांनी शाळा स्तरावर भेटी दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उपस्थित शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सुचनांनुसार पाठयपुस्तके देवून शाळा व्यावस्थापने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तसेच ‘माझं लातूर, हरित लातूर’ उपक्रमातून वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘शाळेतील पहिले पाऊल, वृक्ष लावून’ हा उपक्रमही राबवण्यात आला.