लातूर : नीट परीक्षेमध्ये बिहारमधल्या पाटण्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे पुढे येत असून या प्रकरणाचा सीबीआय करत आहे. महाराष्ट्रातील लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचे धागेदोरे सापडत आहेत.
नीट प्रकरणातील दोन्ही आरोपी सीबीआयने ताब्यात घेतले आहेत. या दोघांनी नीटसह अन्य परीक्षांमध्येही गैरव्यवहार केल्याचा सीबीआयला संशय आहे. तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे या ३ व्यक्तींवर सीबीआयचा संशय असून या तिघांचा नेमका रोल काय, याची चौकशी सीबीआय करणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणातील २ आरोपींना मंगळवारी न्यायालयाने सीबीआयच्या ताब्यात दिले. तर नीटसह अन्य परीक्षांमध्ये गैरव्यवहार केल्याचा सीबीआयला उइक संशय आल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान यात आणखीन काही आरोपी असल्याचे देखील धागेदोरे सीबीआयला मिळाले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या माहितीनुसार लातूर शहरातील तोडकर, उप्पलवार आणि डोंगरे या तिघांचे यामध्ये काय कनेक्शन आहे, यासाठी आज यांची सीबीआय चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या मे महिन्यात झालेल्या ‘नीट’ परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा दावा करणा-या असंख्य याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. काही याचिकांमध्ये ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचे निर्देश दिले जावेत अशी विनंती करण्यात आली आहे. ८ जुलै रोजी एकूण २६ याचिकांवर सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’, ‘आयुष’ तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश ‘नीट’ परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जातात. ५ मे रोजी देशभरातील ४ हजार ७५० केंद्रांवर झालेल्या ‘नीट’ परीक्षेस २४ लाख विद्यार्थी बसले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार परीक्षेचा निकाल १४ जून रोजी जाहीर केला जाणार होता मात्र तत्पूर्वीच ४ जून रोजी हा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर या परीक्षेत अनियमितता झाल्याचे आणि पेपरफुटीचे दावे करीत सर्वोच्च न्यायालयामध्ये असंख्य याचिका दाखल झाल्या होत्या. दिल्लीसह देशाच्या इतर भागांत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलनेही केली होती.