ठाणे : एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे मृत्यू दाखले तयार करून विमा कंपनीची फसवणूक करत मिरा भाईंदरमध्ये ७० लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अद्याप एकालाही अटक करण्यात आली नसून चार जणांचा शोध सुरु आहे. आरोपींमध्ये एका डॉक्टराचाही समावेश आहे.
भाईंदर पश्चिमेच्या प्रभातनगर, राई गाव येथे राहणा-या कांचन ऊर्फ पवित्रा रोहीत पै, रोहित पै, धनराज पै आणि डॉ. आशुतोष यादव यांनी मिळून बनावट कागदपत्रे तयार केली. आरोपी त्या कागदपत्रांच्या आधारे इन्शुरन्स कंपन्यांकडून क्लेम मिळवायचे, टर्म इन्शुरन्स काढायचे आणि त्यानंतर मयत दाखवून त्याचे बनावट कागदपत्रे बनवून इन्शुरन्स कंपनीला सादर करायचे. इन्शुरन्स क्लेम मिळाल्यानंतर ते घर सोडून दुसरीकडे रहायला जायचे. तेथे रहायला गेल्यानंतर त्या पत्त्यावर पुन्हा त्याच व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स काढायचे.
अशा प्रकारे आरोपींनी आयसीआयसीआय, मॅक्स लाईफ, भारती एक्सा, फ्युचर जनरल, एचडीएफसी इन्शुरंस अशा सहा इन्शुरन्स कंपन्याच्या पॉलिसी काढल्या होत्या. त्यातील चार कंपन्यांकडून १,१०,५८,७५० रुपयांचा क्लेम केला. क्लेम केल्यानंतर त्या रकमेपैकी ६९ लाख ६० हजार रुपयांची क्लेमची रक्कम मिळवली.