जानेवारी ते जूनच्या थकबाकीसह मिळणार रक्कम
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. राज्यात पुढील काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचा-यांना खुश करणारा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारच्या सेवेत असणा-या कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के इतकी वाढ करण्यात आली. त्यामुळे महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज बुधवार १० जुलै रोजी काढण्यात आला.
राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबरोबर इतर महत्वाच्या मागण्यांच्या संदर्भात मागील महिन्यात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २ स्वतंत्र बैठका झाल्या. त्या सदर बैठकांमध्ये केंद्राप्रमाणे १ जानेवारी, २०२४ पासून ४ टक्के महागाई भत्ता वाढ थकबाकीसह मंजूर करण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली होती. त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले होते. महागाई भत्त्यातील वाढ ही शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांना मिळणार आहे.
या पार्श्वभूमीवर शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात १ जानेवारी, २०२४ पासून ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही वाढ जानेवारी ते जून या ६ महिन्यांच्या थकबाकीसह जुलै महिन्याच्या वेतनात रोखीने मिळणार आहे. संघटनेनेचे नेते ग. दि. कुलथे, विनोद देसाई, समीर भाटकर व नितीन काळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.