मुंबई : प्रतिनिधी
दीर्घकाळानंतर एसटी कर्मचा-यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत एसटी कर्मचा-यांना सरसकट पाच हजार रुपये वेतन वाढ द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गुणवंत सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी सहा महिने एसटी कर्मचा-यांनी आंदोलन केले. तेव्हा विलीनीकरणाची मागणी चुकीची असल्याचे सांगण्यात येत होते. विलीनीकरणाऐवजी शासनाने वेतनवाढ दिली. तरीही सदावर्ते यांनी कर्मचा-यांचे आंदोलन रेटले. एसटीच्या तत्कालीन संघटनांचा प्रभाव या आंदोलनाने कमी केला.
मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता रद्द झाली. पुढे सदावर्ते यांचे संचालक मंडळ एसटी बॅँकेवर निवडून आले. त्यानंतर बॅँकेचा कारभार वादात सापडला. कर्मचा-यांना सहज मिळणारे कर्ज व ठेवीचे पैसे परत मिळणे मुश्कील झाले. यातच सदावर्ते यांनी नातेवाइकाला बॅँँकेच्या उच्चपदावर नियुक्त केले. कर्मचा-यांची बनावट भरती केली. त्यातूनही लाभ कमवला असे अनेक आरोप झाले.
सदावर्तेना बाजूला करून एसटी कर्मचा-यांच्या ९ संघटनांनी कर्मचारी हिताच्या मागण्यांसाठी मुंबईत धरणे आंदोलन सुरू केले. ९० हजार कर्मचा-यांच्या कुटुंबातील प्रत्येकी चार मतदार धरले तरी साडे तीन ते चार लाख मतदारांची नाराजी सत्ताधा-यांवर ओढवली जाणार आहे.