गाठीभेटी सुरू, अजित पवारांची दिल्ली वारी
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडीने बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शरद पवार यांनी आधी शिवसेनेच्या नेत्यांशी आणि आज कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून जागावाटपाचे सूत्र लवकर ठरविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे महायुतीतही चर्चा सुरू आहे. परंतु तीनही घटकपक्षांत नाराजीनाट्य रंगल्याचे बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आज मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. या निमित्ताने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
आज सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस नेत्यांची बैठक झाली. यावेळी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी जागावाटपावर सविस्तर चर्चा केल्याचे समजते. स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन जागा वाटप करावे आणि जिथे आमदार आहेत, ती जागा संबंधितांना सोडावी, यापद्धतीने चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच या हालचाली सुरू झाल्या आहेत.
यासोबतच महायुतीत हालचाली वाढल्या आहेत. एकीकडे जागावाटपावर दावे-प्रतिदावे सुरू असताना गाठीभेटीही सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी रात्री अचानक दिल्लीवारी केली. मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकतास चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेतेही उपस्थित होते. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईत पोहोचले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे महायुतीतही हालचालींना वेग आला आहे.
महायुतीत दावे-प्रतिदावे
आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरूनही महायुतीतील तीनही पक्षांत वेगवेगळे दावे केले जात आहेत. जागांवरूनही आकडेमोड केली जात आहे. त्यावरून धुसफूस सुरू असल्याचे चित्र आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुती एकसंघ राहण्यासाठी परिस्थिती कशी हाताळतात, ते पाहणे महत्त्वाचे आहे.