24.5 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्यालॅटरल एंट्री : आरक्षण असायलाच पाहिजे, ‘युपीएससी’भरतीवरून ‘एनडीए’मध्ये फूट

लॅटरल एंट्री : आरक्षण असायलाच पाहिजे, ‘युपीएससी’भरतीवरून ‘एनडीए’मध्ये फूट

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या युपीएससीतील लॅटरल एंट्रीच्या मुद्द्यावरून देशात राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारमध्ये ४५ वरिष्ठ अधिका-यांची ‘लॅटरल एंट्री’द्वारे नियुक्ती करण्याचा प्रस्ताव वादाच्या भोव-यात सापडला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या अधिसूचनेवर केवळ विरोधकच नाही तर, सत्ताधारी ‘एनडीए’तील घटक पक्षांतूनही विरोध होताना दिसत आहे.

‘एनडीए’तील नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास पासवान)ही या निर्णयाचा विरोध केला आहे. यांच्या मते, कुठल्याही सरकारी भरतीमध्ये आरक्षणाची तरतूद असणे आवश्यक आहे.

याशिवाय, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) नोकरशाहीतील ‘लॅटरल एंट्री’च्या समर्थनात दिसत आहे. तसेच, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षासह अनेक विरोधी पक्षांनीही लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करण्यावर आक्षेप नोंदवला आहे.

‘युपीएससी’ कडून शनिवारी लॅटरल एंट्रीद्वारे ४५ पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी याविरोधात मोर्चा उघडला. यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही याला विरोध केला. तर सोमवारपर्यंत यासंदर्भात ‘एनडीए’तील घटक पक्षांची नाराजीही समोर आली.

यासंदर्भात ‘एलजेपी’चे (रामविलास) अध्­यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, कुठल्याही सरकारी नियुक्तीत आरक्षणाची तरतूद असायला हवी. यात कसल्याही प्रकारे किंतु परंतु नाही. खाजगी क्षेत्रात आरक्षण नाही आणि जर सरकारी पदांवरही ते लागू केले जात नाही… ही माहिती माझ्या निदर्शनास आली आणि हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. तसेच, आपला पक्ष अशा प्रकारच्या निर्णयांचे कदापी समर्थन करत नाही.

विरोधकांना मुद्दा देत आहे सरकार
जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी द इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना म्हणाले, ‘आम्ही पहिल्यापासूनच सरकारांना आरक्षण भरण्यासंदर्भात मागणी करत आहोत. आम्ही राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी आहोत. शतकानुशतके लोक सामाजिकदृष्ट्या वंचित असताना आपण योग्यता का मागत आहात? सरकारचा हा आदेश आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे, असे करून सरकार विरोधकांना मुद्दा देत आहे. एनडीएला विरोध करणारे लोक याचा दुरुपयोग करतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR