30.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeपरभणीकरपरा नदीच्या पुरात १५ शेळ्या, मेंढ्यासह गाय-वासरू गेले वाहून

करपरा नदीच्या पुरात १५ शेळ्या, मेंढ्यासह गाय-वासरू गेले वाहून

कौसडी : जिंतूर तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे करपरा नदीला पूर आल्याने यापुरात ७ मेंढ्या व ८ शेळ्यासह ७ पिले वाहून गेली आहेत. तसेच एका शेतक-याच्या आखाड्यावर बांधलेले एक गाय व वासरू या नदीच्या पात्रात वाहून गेल्याची घटना देखील घडली आहे.

बोरी येथील मेंढपाळ संजय सोपानराव शिंपले यांनी पंडितराव उत्तमराव घोलप यांच्या शेतामध्ये मेंढ्या बसवल्या होत्या. अचानक झालेल्या वादळी पावसाने करपरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. यापुरामध्ये १५ ते २० मेंढ्या व शेळ्या वाहून गेल्याने त्यांचे १ लाख ५४ हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच येथील अनंतराव श्रीरंगराव चौधरी यांचे आखाड्यावरील एक गाय एक वासरू या पुराच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेचा पंचनामा तलाठी हनुमान बोरकर यांनी केला. या अवकाळी पावसाने रविवारी रात्री धुमाकूळ घातला असून तूर, कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे पाण्याने भिजल्याने खाली जळाला आहे. याबाबत प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात नदीला पूर आला नाही. परंतू काल झालेल्या अचानक वादळी पावसाने प्रथमच करपरा नदीला पूर आला. शेतकरी आपल्या कामांमध्ये व्यस्त होती. अचानक आलेल्या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

प्रयत्न करूनही मेंढ्यांना वाचवू शकलो नाही
अचानक झालेल्या पावसाने मेंढ्याना पूर्णपणे झोडपले असून थंडीने त्या कुडकुडत होत्या. काही मेंढ्याना सकाळच्या वेळेला जाळ करून शेक दिला. परंतु त्यातील काही मेंढ्या दगावल्या. मेंढ्याला वाचण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याना वाचवू शकलो नाही अशी प्रतिक्रिया मेंढपाळ संजय सोपानराव शिंपले यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR