मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पुढील ३-४ तास मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट पाहायला मिळेल. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी सात वाजता हवामान विभागाने जारी केलेल्या इशा-यानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच, वारा ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील चार दिवस पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबरपर्यंत पावसाची स्थिती कायम राहील. मुंबईमध्ये देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. काल रात्री मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे.
पुण्यातील पावसाची स्थिती
परतीच्या पावसाने पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे या धरणांमधून मुळा-मुठा तसेच पवना नदीपात्रातील विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी पूरस्थितीपासून सावध रहावे असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.