23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रवाळवा विधानसभेसाठी सदाभाऊंचा ‘खोडा’

वाळवा विधानसभेसाठी सदाभाऊंचा ‘खोडा’

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी त्यांनी वाळवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे.

वाळवा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे. यामुळे या मतदारसंघावर राज्याचे लक्ष असते. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे ही लढत चुरशीची होणार असल्याच्या चर्चा आहे. भाजपा, शिवसेनेने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. तर आता स्वत: आमदार सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महायुतीच्या बैठकीनंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, महायुतीच्या निवडणुकीबाबत काही महत्वाच्या बाबींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली. वाळवा विधानसभा मतदारसंघ हा रयत क्रांती संघटनेला सोडावा अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि स्वत: मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे त्यामुळे आम्हाला हा मतदारसंघ सोडावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली.

जयंत पाटील सतत ७ वेळा विजयी
आम्ही निवडणकीची तयारी केली आहे, महायुती जो निर्णय घेईल, त्या निर्णयासह आम्ही असू, असेही आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. वाळवा विधानसभा मतदारसंघातून सलग सातवेळा माजी मंत्री जयंत पाटील विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास व जलसंपदा अशा विविध खात्यांचा कारभार त्यांनी मंत्री म्हणून पाहिलेला आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR