कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यंदा राज्यात परीक्षार्थींची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३५ हजारांनी वाढली आहे. दहावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १९ हजारांनी तर बारावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत १७ हजारांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले परंतु आता या हॉल तिकिटांवरील गोंधळ समोर आला आहे.
विद्यार्थ्यांनी घेतलेला विषय हॉल तिकिटावर आला नाही. त्याऐवजी दुसराच विषय हॉल तिकिटावर आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे. यासंदर्भात कोल्हापूरमधील पालक महाविद्यालयात पोहचले असून प्रशासनाला जाब विचारत आहेत.
महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले आहेत. परंतु परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विषयांपेक्षा वेगळे विषय आल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील पालक विमला गोयंका महाविद्यालयात पोहचले. पालकांनी यासंदर्भात प्रशासनाला जाब विचारला आहे. एकाच वेळी महाविद्यालयात मोठ्या संख्येने पालक जमा झाल्याने गोंधळ उडाला आहे.
विद्यार्थी बारावीत जो विषय शिकले. ज्या विषयाचा अभ्यास केला, तो विषय हॉल तिकिटावर दिलेला नाही. वर्षभर दुस-या विषयाचा अभ्यास करून हॉल तिकिटावर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. परीक्षेच्या तोंडावर हॉल तिकिटांवर झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.
कॉपीमुक्तीसाठी प्रशासन सज्ज
इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासह मुक्त वातावरणात परीक्षा होण्याच्या दृष्टीने व परीक्षेदरम्यान कॉपीला आळा बसावा यासाठी कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचा निर्धार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा भयमुक्त वातावरणात होतील याची केंद्र संचालकांनी काळजी घ्यावी याबद्दल देखील सूचना देण्यात आल्या. परीक्षा दरम्यान ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नियमांची उल्लंघन केल्यास संबंधित झेरॉक्स दुकानदारांना सहआरोपी करण्याचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले.