मुंबई : प्रतिनिधी
आम्ही कल्याकारी मंडळ निर्माण केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षा चालक आहेत, त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले ६५ वर्षांच्या वरील जे काही रिक्षा चालक आहेत, त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याला अनुदान म्हणा किंवा पुरस्कारही म्हणता येईल. हे अनुदान आम्ही एकदाच देणार आहोत, असे राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
आजच्या घडीला राज्यात १४ हजार ३८७ रिक्षालाचक ६५ वर्षांवरील आहेत. त्यांना यावर्षी आम्ही १० हजारांची रक्कम देणार आहोत, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली. ते मुंबईत पार पडलेल्या आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत बोलत होते. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या दिघे साहेबांच्या नावाने मंडळ स्थापन केले. त्यानुसार २७ जानेवारी हा या महामंडळाचा वर्धापन दिन असेल. 50 कोटी रुपयांची तरतूद या महामंडळासाठी करण्यात आलेली आहे, असेही ते म्हणाले.