पुणे : राज्यात फेब्रुवारी महिन्यात चांगलेच ऊन जाणवले. यंदा फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडाखा बसला. यामुळे यावर्षी उन्हाळा तीव्र असणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. परंतु वातावरणातील विचित्र बदलाचा अनुभव नाशिककरांना आला. एका दिवसात ७ अंशांनी तापमान घसरले. निफाडमध्ये शीतलहरी वाहू लागला. बुधवारी रात्रभर तसेच गुरुवारी पहाटे थंडीचा निफाडमध्ये थंडीचा कडाका जाणवला. नाशिक जिल्ह्याचे तापमान घसरले. नाशिक शहरात १० अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये ४.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले.
राज्यभरात सर्वत्र उन्हाच्या झळा बसत असताना आता नाशिकच्या निफाडमध्ये थंडीचा गारवा गुरुवारी जाणवायला सुरुवात झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे नाशिक जिल्ह्यात असलेल्या निफाडमध्ये तापमान कमी झाले. यामुळे निफाडमध्ये पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. निफाडचे कमाल तापमान ३१.३ तर किमान तापमान ४.२ अंशावर वर पोहचले आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ४.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणा-या गार वा-यांमुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. राज्यभरात तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागत आहे.
बुधवारी निफाडमध्ये विचित्र वातावरणाचा अनुभव नागरिकांना आला. दिवसा उन्हाच्या झळांची तीव्रता होती. त्यानंतर कमाल तापमान दोन अंशांनी घसरले. मग किमान तापमानाचा पारा वेगाने खाली घसरला. पहाटे फिरण्यासाठी जाणा-या नागरिकांना स्वेटर काढावे लागले. जळगाव जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंश तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस एवढे आहे. जळगावात सकाळी आणि रात्री थंडी तर दिवसभर उकाडा जाणवत आहे. जम्मू काश्मीर भागात पश्चिमी विक्षोभामुळे बर्फवृष्टी होत आहे. परिणामी उत्तरेकडून येणा-या शीतलहरींमुळे जळगावसह जिल्ह्याच्या वातावरणात बदल झाला आहे.
मंगळवारी रात्री जळगावाचे किमान तापमान १७ अंशांवर होते. ते बुधवारी १० अंशांपर्यंत घसरल्याने गारव्यासोबतच थंडीही जाणवत आहे. होळीनंतर वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. दरम्यान ८ मार्चपर्यंत पहाटेचा गारवा अधिक राहणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
का बदलले तापमान?
उत्तर भारतातून येणारे थंड वारे नाशिक, विदर्भासह राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये येत आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात एकाकी थंडी वाढली आहे. दीड महिन्यांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात पूर्वीय दिशने दमट आणि आर्द्रतायुक्त वा-यांचा एकसुरी वहनामुळे राज्यात झेपावणा-या थंड वा-यांना अडथळा येत होता. थंडीची लाट अजून एक-दोन दिवस राहण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.