लातूर : प्रतिनिधी
लातूर शहराची ओळख व्यापारी शहर म्हणुन होती. कालांतराने यात बदल होऊन लातूर शैक्षणिक केेंद्र बनले एवढेच नव्हे तर लातूर शहरात मिळणा-या दर्जेदार वैद्यकीय सुविधामुळेही लातूरमध्ये विद्यार्थी, रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात राहतात. अशांना रमजानमध्ये पहाटे सहरची सोय व्हावी, या उद्देशाने २०१७ साली येथील उस्मानपुरा बॉइज गु्रपच्या वतीने मोफत सहरची सोय करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला टेक मस्जिद कमिटीनेही सहमती दर्शवली आणि हा उपक्रम सुरु झाला. दररोज पहाटे २ ते ५ या वेळेत शहरातील घर, हॉस्टिल, वसतीगृहांना ८०० डबे पोच होत आहेत. यामुळे विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक व रुग्णांचे नातेवाईक यांच्या सहरची सोय होत आहे.
लातूर शहरात पहाटे सहरची कोठेच सोय नव्हती. भल्या पहाटे कुठलेही हॉटेल उघडे नसायचे, फळाचे स्टॉलही नसे. अशा परिस्थितीत लातूर शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, रुग्णांचे नातेवाईक किंवा व्यापारानिमित्त आलेले व्यापारी यांच्या सहरची काहींच सोय नव्हती. रमजानचा रोजा इफ्तारसाठी अनेकजन पुढे येतात. परंतू, ज्यांची घरे लातूर शहरात नाहीत, अशांसाठी पहाटेच्या सहरसाठी काही तरी सोय करायला हवी, या विचाराने उस्मानपुरा बॉईज ग्रुपने प्रारंभी ५ किलो राईस वितरण करण्यापासून हा उपक्रम सुरु केला. आज हा उपक्रम ८०० डब्यांपर्यंत गेला आहे. यासाठी दररोज १३५ तरुण मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यंदा एक हजार मुलांमुलींसह, रुग्णांचे नातेवाईकांना मोफत डबे दिले जात आहेत.
सहरची गैरसोय होणार नाही यासाठी शहरातील शिकवणी क्लासेस, हॉस्पिटलस्च्या परिसरात सहरची मोफत सोयचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्यावरील मोबाईल क्रमांकावर कॉल करताच डबा मागवला तेथे तत्काळ पोचतो. त्यासाठी २० तरुणांची टिम काम करते. डबे भरण्याकरीता ६० तरुणांची टिम आहे. मागणीनूसार विद्यार्थी व रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत डबे दिले जातात. सहरचा प्रति डबा ८० रुपये खर्च येतो. एक हजार डब्यांसाठी महिनाभरात २४ लाखांचा खर्च येतो. या खर्चाची जबाबदारी १५ ते २० तरुणांचा ग्रुप घेतो. विशेष म्हणजे रात्र जागुण स्वयंपाक तयार करणारी मंडळी महिनाभर मोफत सेवा देत आहेत. डबे पोचविणारी २० जणांची टिम स्व खर्चाने आपापल्या वाहनात पेट्रोल टाकुन सेवा देत आहेत. या उपक्रमाला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. देणारे देत आहेत, गरजवंतांपर्यंत ते पोचत आहे.