कणकवली : हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे आमच्यावर सातत्याने टीका करत आहेत. पण भगव्याचा द्वेष करणा-या आणि हिरव्याचे लांगुलचालन करणा-या ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यात, देशात हिंसाचार करणा-यांमध्ये सगळे एकाच धर्माचे कसे आढळतात? आणि त्याविरोधात आम्ही आवाज उठवला तर आम्ही चुकीचे कसे ठरू शकतो असा सवाल पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, भाजप पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग देखील ठाकरेंना खुपतोय. तो काढावा अशी ते मागणी करत आजहेत. पण आमचा झेंडा कसा दिसावा याची चिंता त्यांनी करू नये. कारण आता भगवा आणि ठाकरे यांचा काहीही संबंध राहिलेला नाही.
मुख्यमंत्री होऊन देखील ठाकरेंना संवैधानिक प्रक्रियांची माहिती नाही. विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवल्यावरून ते टीका करत आहेत. वस्तुत: जो कायदा देशाला तोच राज्याला लागू होतो. संसदेमध्ये विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने संसदेत विरोधी पक्ष नेता नव्हता. तशीच स्थिती राज्यात आहे. पण ठाकरेंना कायद्याचा कोणताही अभ्यास नाही.
देशात, राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व हिंसाचारामधील आरोपी हे एकाच धर्माचे आहेत. त्यामुळेच आम्ही त्या विरोधात आवाज उठवत आहोत. आम्हाला हिंदूत्व शिकवणा-यांनी कधी त्या धर्मातील उन्मादींना संविधान शिकवलं आहे का? त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे का? हे आधी तपासून पहावं, असेही मंत्री राणे म्हणाले.