पंढरपूर / प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू आहे ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम सुरू असताना गुरुवारी सोळखांबीच्या बाजूला असलेल्या हनुमान दरवाजा जवळ दगड खचल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी सुमारे सात ते आठ फुटाचे तळघर आढळून आले असून यामध्ये देवाच्या मुर्त्या असल्याचा अंदाज मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत लवकरच मंदिर समितीचे अध्यक्ष आणि पुरातत्त्व विभागाची टीम या तळघराची पाहणी करून पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. सुरुवातीला मंदिरातील सर्व दगडावरील आणि दरवाज्यावरील चांदी काढण्यात आली. यामध्ये सुमारे 877 किलो चांदी काढण्यात आली. ही चांदी वितळवून नवीन मेघडंबरी व दरवाजे तयार केले जाणार आहेत हे काम आषाढी यात्रेपूर्वी करण्यात येणार आहेत.