छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये हातमोजे बनवणा-या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असताना कंपनीला आग लागली. वाळूज औद्योगिक परिसरातील हातमोजे बनवणा-या सनशाईन एंटरप्रायजेस कंपनीला आग लागली. या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ४ कामगारांनी स्वत:चा जीव वाचवला.
वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्रायजेस सी २१६ या हातमोजे बनवणा-या कंपनीमध्ये सुमारे २० ते २५ कामगार काम करतात. १० कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचे दिसले. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरू झाली.
कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणे शक्य नव्हते, पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने सुखरूप बाहेर पडण्यात यश मिळवले. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन (मिर्झापूर) कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
आगीतून सुखरूप बचावलेला कामगार अली अकबर याने घडलेला प्रकार सांगितला. अली अकबरने सांगितले की, ‘काम बंद करून आम्ही झोपी गेलो होतो. मध्यरात्री आम्ही पांघरून घेऊन झोपलो असता, आम्हाला गरमी झाल्याने जाग आली. आगीच्या वाफेमुळे गरम होऊन जाग आली आणि आजूबाजूला पाहतो तर सगळीकडे आग पसरली होती. आम्ही आरडाओरड करत इतरांना जागे करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूने आग लागल्याने आगीतून बाहेर पडणे कठीण झाले होते. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरूप बाहेर पडले.’
अग्निशमन अधिकारी मोहन मुनसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला २.१५ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तिथे पोहोचल्यानंतर फॅक्टरीत आग लागल्याने धुमसत असल्याचे चित्र होते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीमध्ये सहा जण अडकल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग करून आतमध्ये अडकलेल्या कर्मचा-यांना बाहेर काढले. पहाटे चार वाजेपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यानंतर आग विझविण्यात यश आले. आगीत सहा कर्मचा-यांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अग्निशमन दलाचे अधिकारी राजेश घरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर वाळूज येथील एमआयडीसीमधील कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये सहा कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.