नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. याची सुरुवात त्यांनी मोदी सरकारने गेल्या १० वर्षांमध्ये काय-काय केले हे सांगण्यापासून केली. त्यानंतर त्यांनी विविध घोषणांना सुरुवात केली.
यावेळी त्यांनी सांगितले, की आयुष्मान भारत योजनेतील आरोग्य सुविधांचा लाभ आता आशा आणि अंगणवाडी सेविकांना देखील मिळणार आहे. यासोबतच अंगणवाडी मदतनीसांना देखील याचा लाभ मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना दरवर्षी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. आता अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर्सनादेखील या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येणार आहेत.
आयुष्मान योजनेत भारतातील कित्येक खासगी आणि सरकारी रुग्णालयांचा समावेश आहे. यामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर देखील उपचार केले जातात.