कोलकाता : भारताचे दोन खेळाडू श्रेयस अय्यर आणि इशान किशनवर बीसीसीआय जाम नाराज असल्याची माहिती मिळत आहे. बीसीसीआय या दोघांवर मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. अय्यर आणि किशनला रणजी ट्रॉफी न खेळण्याची शिक्षा मिळू शकते. बीसीसीआय या दोघांचा केंद्रीय करार रद्द करण्याची शक्यता आहे. या दोघांनीही रणजी ट्रॉफीपेक्षा आयपीएलला जास्त महत्व दिल्याने ही कारवाई होऊ शकते.
श्रेयस अय्यरला मार्च २०२३ च्या केंद्रीय करारात ब गटात समाविष्ट केले होते. या कराराअंतर्गत श्रेयस अय्यरला वर्षाला ३ कोटी रूपये मिळतात. इशान किशनचा क गटात समावेश आहे. त्याला वर्षाला १ कोटी रूपये मिळतात. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय काही कालावधीतच नव्या केंद्रीय कराराची घोषणा करण्याची शक्यता आहे. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवडसमितीने २०२३-२४ साठी करारबद्ध करायच्या खेळाडूंची यादी जवळपास निश्चित केली आहे. या यादीची घोषणा लवकरतच होण्याची शक्यता आहे. यातून इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना वगळण्याची शक्यता आहे. कारण हे दोघेही बीसीसीआयच्या आदेशानंतरही ते रणजी ट्रॉफी खेळत नाही आहेत.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी यापूर्वीच प्रत्येक करारबद्द खेळाडूला मेल करून रणजी ट्रॉफी खेळणे सक्तीचे केले होते. इशान किशनने दक्षिण आफ्रिका दौ-यातून मानसिक थकवा आल्याचे कारण देत माघार घेतली होती. त्यानंतर तो मैदानावर परतलेला नाही. आता तो थेट आयपीएल खेळण्याची शक्यता आहे. तो काही दिवसांपूर्वी बडोद्यात हार्दिक पांड्यासोबत सराव करताना दिसला होता. अय्यरला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत तिस-या कसोटीत संघा स्थान मिळाले नाही. बीसीसीआयने अय्यरला वगळण्याचे कारण सांगितले नव्हते. अय्यरने रणजी ट्रॉफी खेळणे टाळले. तसेच बॅक पेनचे कारण देत बाद फेरीतून देखील माघार घेतली होती.