22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीय१६ फेब्रुवारीला भारत बंद

१६ फेब्रुवारीला भारत बंद

नवी दिल्ली : दिल्ली पुन्हा एकदा शेतक-यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील जवळपास १०० गावांतील हजारो शेतकरी गुरूवारी सरकारने अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात वाढीव मोबदला आणि भूखंड मिळावेत, या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आणि संसदेकडे कूच केली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. यादरम्यान दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागांमध्ये वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलन करत असल्यामुळे दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा आणि ग्रेटर नोएडा प्राधिकरणाच्या कार्यालयाबाहेर शेतक-यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस आणि जिल्हा प्रशासनासोबत झालेली शेतक-यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर हा निर्णय घेण्यात आले आहे. भारतीय किसान युनियनच्या (बीकेपी) सदस्याने गुरुवारी रात्री सांगितले की, संसदेचे अधिवेशन या आठवड्याच्या शेवटी संपत आहे आणि पुढील बैठकीत आमच्या प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास आम्ही पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करू. दरम्यान, काल दुपारी १२ च्या सुमारास नोएडातील महामाया उड्डाणपुलावरून निघालेल्या आंदोलकांना राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी एका बाजूला नोएडा पोलिस आणि दुसरीकडे दिल्ली पोलिसांसह चिल्ला सीमेवर बॅरिकेड्स उभारण्यात आले होते.

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत सांगितले की, १६ फेब्रुवारीला देशभर चक्का जाम होणार आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत काल (गुरुवारी) चपरगढ पेट्रोल पंप येथे जमले आणि जेवरच्या मेहंदीपूर गावात पोहोचले. येथे आयोजित पंचायतीत टिकैत म्हणाले की, संयुक्त आघाडीच्या आवाहनावर १६ फेब्रुवारीला चक्का जाम होणार आहे. तर १४ मार्चला शेतकरी दिल्लीकडे कूच करणार आहेत. त्यासाठी शेतक-यांनी पूर्ण तयारी करावी. हक्कासाठी लढावे लागते. शेतकरी अनेक दिवसांपासून एमएसपीची मागणी करत आहेत. सरकार शेतक-यांना एमएसपी देत ​​नाही. प्रत्येक वेळी अर्थसंकल्पात शेतक-यांची फसवणूक होते.

१६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक
ग्रेटर नोएडामध्ये भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी यांनी शेतकरी, तरुण, रोजंदारी मजूर आणि इतरांवर प्रभावित करणा-या अनेक समस्यांचे कारण देत १६ फेब्रुवारीला भारत बंदची हाक दिली. तसेच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १६ फेब्रुवारीला होणारा भारत बंद यशस्वी करण्यासाठी काम केले पाहिजे असे राकेश टिकैत यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे म्हटले आहे. दरम्यान, शेतक-यांच्या आंदोलनामुळे नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे आणि डीएनडी फ्लायवे या प्रमुख मार्गांसह विविध मार्गांवरील वाहनांची हालचाल मंदावली आणि त्याचा परिणाम दिल्लीतही झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR