सोलापूर :- पैशाच्या देवाण-घेवाणी वरून प्रकाश अशोक चव्हाण वय ४२ गेंट्याल चौक सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेत शिवराज गुरुनाथ माळी रा. सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व मंजुषा देशपांडे या दोन सदस्य खंडपीठाने अपिलात जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, यातील मयत प्रकाश चव्हाण हा दि: २६/०७/२०१७ रोजी त्याच्या कुल वेअर नावाचे दुकानात बसला असताना आरोपी भीमाशंकर झळके व शिवराज माळी त्या ठिकाणी गेले, काही वेळ बोलणे झाल्यानंतर आरोपी भीमाशंकर झळके याने प्रकाश याच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, तो वार मयत प्रकाश याने चुकवला व तेथून पळून जात असताना त्याला शिवराज माळीने धक्का देऊन खाली पाडले, तेवढ्यात झळके याने त्याच्या पाठीत चाकूने वार केला,सदर घटनेत प्रकाश हा मयत झाला.
घटना ही दुकानातील सी सी टी व्ही मध्ये कैद झाली होती,त्याआधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली होती व सदरचा खून हा बिशीच्या पैशाच्या देवाण घेवाणीवरून झाला असल्याचे निष्पन्न झाले.घटनेची फिर्याद मयताचे वडील अशोक चव्हाण याने पोलीस ठाण्यात दिली होती.त्यावरून सदरचा खटला जिल्हा न्यायालय सोलापूर येथे चालला त्यावरून आरोपीस खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
सदर शिक्षेविरुद्ध आरोपी शिवराज माळी याने मुंबई उच्च न्यायालयात ऍड रितेश थोबडे यांचे मार्फत अपील दाखल केले होते. अपीलामध्ये जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
जामीन अर्जाच्या सुनावण्याच्या वेळेस ॲड रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात
कोर्टापुढे आलेल्या पुराव्यावरून आरोपीची घटनास्थळावरील उपस्थिती व त्याने केलेला हल्ला संशयास्पद वाटतो असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपीस जामीन मंजूर केला.यात आरोपीतर्फे ॲड रितेश थोबडे यांनीतर सरकारतर्फे ऍड.व्ही.बी कोंडे-देशमुख यांनी काम पाहिले.