नवी दिल्ली : वंदे भारत या भारताच्या प्रिमियम ट्रेनसंदर्भातील अनेक तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत. यामध्ये पावसाळ्यात गळणारे डबे तर रेल्वे ट्रॅकवर आलेल्या भटक्या जनावरांमुळे झालेले ट्रेनचे नुकसान या गोष्टींचा समावेश आहे. त्यात आता या ट्रेनमधील जेवणात झुरळ आढळल्यानं खळबळ उडाली आहे.
पण विशेष म्हणजे ज्या प्रवाशाच्या जेवणात हे झुरळ आढळून आले त्याने थेट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधून रेल्वेच्या केटरिंग व्यवस्थेवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली. भोपाळहून आर्ग्याला जाणा-या वंदे भारत ट्रेनमध्ये मंगळवारी हा प्रकार घडला आहे. विदित वर्ष्णे यांनी यासंदर्भात आपल्या नातेवाईकांच्यावतीने तक्रार करणारी पोस्ट फोटोसहित सोशल मीडियावर लिहिली.
आयआरसीटीसीने घेतली दखल
आयआरसीटीसीने वर्ष्णे यांच्या तक्रारीची गुरुवारी दखल घेतली. प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, तुम्हाला प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेण्यात आली असून योग्य तो दंड सेवा देणा-या कंपनीला ठोठावण्यात आला आहे.