नाशिक : प्रतिनिधी
मान्सूनपूर्व शेती कामांना आता सुरुवात झाली आहे. शेती कामांमध्ये शेतकरी व्यस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मान्सुनचे आगमन राज्यभर झाले असून गेली दोन दिवसापासून नाशिकमध्ये पाऊस पडत आहे. नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.
गेल्या महिनाभरापासून सातत्याने भाज्यांची दरवाढ सुरू आहे. कोथिंबीर, कांदापातीने शंभरी आहे. कोथिंबीर ७० ते १००, तर कांदापातीचे दर गगनाला भिडले आहेत. कांदापातीचे दर ६० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हिरवी मिरची, वालपापडी, घेवडा, दोडके, गिलके, कारले आदी भाज्यांच्याही दरातही मोठी वाढ झाली आहे.
उत्पादनात घट झाल्याने भाववाढ
कडाक्याचा उन्हाळा आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शेतक-यांचे उन्हामुळे आणि अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता उत्पादनात घट झाल्याने भाववाढ झाल्याची प्रतिक्रिया शेतक-यांनी दिली आहे.