23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रख-या साधू-संतांना भाजपाचा राग

ख-या साधू-संतांना भाजपाचा राग

नाना पटोले यांची टीका

मुंबई : ख-या साधू-संतांना भाजपाचा राग आहे. तसेच देशात भगवे कपडे घालून नौटंकी सुरु आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. चारही शंकराचार्यांनी भाजपाची कृत्यांचा निषेध केला. प्रभू राम हे जणू काही देशाबाहेर गेले आहेत आणि यांचे विश्वगुरू हे रामाला हाताला धरुन अयोध्येत आणत आहेत अशी पोस्टर्स लावली गेली. धर्मगुरुंना हे मुळीच पटलले नाही असेही नाना पटोलेंनी म्हटले आहे.

धर्माविरोधातले पाखंडी लोकच यांना मान्यता देतील. चार शंकराचार्यांनी या सरकारच्या कारभाराला नापास केले आहे. जे खरे साधू संत आहेत त्यांना भाजपाचा राग आहे. त्याचा परिणाम तुम्हाला निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सध्या देशात भगवे कपडे घालून काही लोकांची नौटंकी सुरु आहे. १५ लाख रुपये आणून देणारे कुठे गेले? भगवे कपडे घातलेल्या काहींनी बोलले म्हणजे हिंदू धर्माने बोलले असे कुणालाही वाटायची गरज नाही असंही नाना पटोले म्हणाले.

सध्या आपल्या देशावर २ लाख ५ हजार कोटींचे कर्ज मोदी सरकारने करुन ठेवले आहे. त्यावर उत्तर दिले पाहिजे. तसंच जीएसटीच्या माध्यमातून जो पैसा गोळा केला आहे तो कुठे आहे? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. आज त्यांनी कितीही डिंगडाँग केले तरीही काही फरक पडणार नाही. आम्ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहोत. लोकांना भाजपा काय आहे ते कळले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा या आम्हालाच मिळतील असंही नाना पटोलेंनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात गुंडाराज सुरु आहे
महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मांत भेद निर्माण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचाराला कलंक लावण्याचे पाप राज्यातील महायुती सरकार करत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. राज्यपाल महोदयांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे अशीही माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR