सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्हा आणि शहरात पावसाने हजेरी मांडली. यामुळे शेतकरी राजा खूश झाला आहे, पण दुसरीकडे भाजीपाल्याला पावसाचा फटका बसला आहे.
यामुळे बाजारात आवक घटली आहे. यामुळेच भाजीपाल्यांचे दर वाढत आहेत, शिवाय फळभाज्यांमध्ये टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, टोमॅटोने जवळपास शंभरी गाठली आहे, तर कांदे आणि बटाटे हे हाफ सेंच्युरीच्या जवळ आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बाजारात पावसाचा फटका बसलेले शेतमाल बाजारात येत आहे. यामुळे काही प्रमाणात डाग पडलेले टोमॅटो बाजारात येत आहेत,
मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे बटाट्याची आवक कमी आहे. यामुळे याचे दर वाढत आहेत, शिवाय बाजारात काकडी कमी झाल्याने याचे दर वाढत आहेत. पावसाचा फटका टोमॅटोला झालेला पहायला मिळत असून टोमॅटो हे डागाळलेले येत आहेत.
तसेच आवक कमी झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून मेथी, शेपू, कोथिंबीर, कडीपत्ता यांच्या दरात वाढ झाली आहे, पण सध्या उन्हाळ्यात पाच ते दहा रुपयांना एक लिंबू विकण्यात येत होते. याचे दर आता मार्केट यार्ड येथे कमी झाले आहेत, पण किरकोळ बाजरात जवळपास पाच रुपयांना एक प्रमाणेच विकले आहेत.
सध्याला झालेला पाऊस हा शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे शिवाय पेरणीला उसंत मिळाली आहे, शिवाय शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आनंदीत आहेत.