पुणे : सध्याच्या शिक्षण पद्धतीत आपण मागणीपेक्षा पुरवठा जास्त करत आहोत. त्यामुळेच बाजारात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. परंतु आता नवीन शिक्षणपद्धती स्वीकारून संशोधन, नवकल्पनांची जोड असणा-या उद्योजकतेचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव तर मिळेलच सोबतच त्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन मिळून बेरोजगारीचा प्रश्नही सुटेल व देशाच्या प्रगतीला हातभार लागेल, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
ते एमआयटी आर्ट, डिझईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेतर्फे विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या ७५ हून अधिक नामवंत कंपन्यांसोबत सामंजस्य करार (एमओयू) कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींसह प्रा. डॉ. सुनीता कराड, प्र. कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ. वीरेंद्र शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. कराड पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात(एनईपी) विद्यार्थ्यांमधील संशोधन व उद्योजकतेवर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. एनईपीची देशभरात घोषणा होण्यापूर्वीच एमआयटी एडीटी विद्यापीठाने संशोधन व उद्योजकतेवर भर देणा-या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी केलेली आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधन गुणांना प्रोत्साहन देण्याचे काम विद्यापीठामार्फत करण्यात येते. दीपप्रज्ज्वलन व विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शेटे यांनी तर आभार डॉ.सुधाकर सानप यांनी मानले.