21.4 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeराष्ट्रीयपर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

सुप्रीम कोर्टाचा निवाळा, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाची चिंता, १० दिवसांत नियम अंतिम करू, केंद्राची ग्वाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ होत चालले आहे. वायू प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले असून खराब हवेमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सुधारणांद्वारे तयार केलेला पर्यावरण संरक्षण कायदा म्हणजे दंतहीन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. दरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) ऐश्वर्या भाटी यांनी केंद्र सरकारच्या वतीने १० दिवसांत नियम अंतिम केले जातील आणि कायदा कार्यान्वित केला जाईल, असे म्हटले आहे.

न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओका यांच्या खंडपीठाने पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई न केल्याबद्दल पंजाब सरकारला फटकारले. पंजाबमधील ज्या अधिका-यांनी कारवाई केली नाही त्यांच्यावर खटला चालवा. तीन वर्षानंतरही आमच्या आदेशांचे पालन केले जात नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांचे सचिव (पर्यावरण) आणि अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी) यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याचे एएसजीने न्यायालयाला सांगितले. १० दिवसात कलम १५ पूर्णपणे कार्यान्वित होईल, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले. यावर न्यायालयाने नियम तुम्हाला खटला चालवण्याची परवानगी देतात. तुम्ही त्यांच्यावर खटला चालवा अन्यथा काहीही होणार नाही, असे म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाने कलम २१ नुसार जगण्याचा अधिकार, शुद्ध हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. अशा स्थितीत सरकारांचे अपयश म्हणजे नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन आहे. राज्यांनी दिलेल्या प्रस्तावावर दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा आणि भरपाईची रक्कम वाढवण्याबाबतच्या नियमात बदल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. आम्ही स्पष्ट करतो की, जर परिस्थिती सुधारली नाही आणि असेच चालू राहिले तर आम्ही कठोर आदेश जारी करू. राज्ये आणि आयोग यांच्यातील समन्वयही महत्त्वाचा आहे, हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले.

दिल्लीतील हवेची गुणवत्ता खराब
राष्ट्रीय राजधानीत आज प्रचंड धुके जमा झाले होते. तिथे हवेची गुणवत्ता ३६३ एक्यूआयसह ‘अत्यंत खराब’ श्रेणीत राहिली तर आणखी काही भाग गंभीर झोनमध्ये आले. जवळजवळ सर्व हवामान निरीक्षण केंद्रे रेड झोनमध्ये होती. जहांगीरपुरी मॉनिटरिंग स्टेशनने ४१८ वर गंभीर वायू गुणवत्ता निर्देशांक नोंदवला तर विवेक विहारचे वाचन ४०७ आणि आनंद विहारचे ४०२ होते.

२ दिवसांत दिल्लीत प्रदूषण ५ पट वाढले
एअर क्वॉलिटी अर्ली वॉर्निंग प्रोटेक्शन यंत्रणेच्या अहवालातून पुढील २ दिवसांत दिल्लीतील हवेचे प्रदूषण ५ पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचवेळी कार्बन मोनोऑक्साईडची पातळी ७ पटीपर्यंत जाऊ शकते. अशी परिस्थिती उद्भवल्यास श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतील. तसेच अनेक रुग्णशय्येवर असलेल्या रुग्णांसाठीही ही धोक्याची घंटा आहे. याच कारणामुळे पंजाब, हरियाणामध्येही वायू प्रदूषण वाढले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR