मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान झाले. मराठी टक्का, गुजराती आणि उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून महायुती आणि महाआघाडीत जोरदार चुरस दिसली. पण आता शिंदे गटातील खदखद पण बाहेर आली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन आलेले खासदार गजानन कीर्तिकर यांची शिंदे गटातून लागलीच हकालपट्टी करण्याची मागणी आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कीर्तिकरांना नारळ देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना उपनेते शिशिर शिंदे खासदार कीर्तिकरांविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी वक्तव्ये केल्या प्रकरणात त्यांची शिवसेनेतून त्वरित हकालपट्टी करण्याची आणि त्यांना निरोपाचा नारळ देण्याची मागणी केली आहे.
शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यात लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्ये केली. विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतल्याने त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्याची विनंती केली.
ते तर ‘मातोश्री’चे ‘लाचार श्री’
खासदार कीर्तिकर ‘मातोश्री’चे ‘लाचार श्री’ झाले आहेत. गजानन कीर्तिकर यांना ‘मातोश्री’वर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. आता गजानन कीर्तिकर यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.