नवी दिल्ली : शेतक-यांनी त्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. देशभरातील शेतक-यांना ६ मार्चला दिल्ली गाठण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले असून, १० मार्च रोजी ‘रेल्वे रोको’ आंदोलनाची घोषणाही केली. तसेच सीमा भागातील शेतक-यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.
शेतकरी नेते सरवनस्ािंग पंढेर आणि जगजित स्ािंग डल्लेवाल यांनी देशभरातील शेतक-यांना ६ मार्चला दिल्ली गाठून आंदोलन करण्याचे आवाहन केले. आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांनी १० मार्च रोजी देशभरात चार तास ‘रेल्वे रोको’ आंदोलनाची हाक दिली. सध्याच्या आंदोलन स्थळी शेतकरी आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि जोपर्यंत सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले. सरकारवर दबाव आणण्यासाठी किसान मोर्चा शेतक-यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे नेतृत्व करत आहे, ज्यामध्ये त्यांची एमएसपीची मागणी महत्त्वाची आहे.
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी शंभू आणि खनौरी आंदोलनस्थळी आंदोलन करत राहतील, असा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला. दरम्यान, संघटनांनी इतर राज्यातील शेतकरी आणि मजुरांना ६ मार्च रोजी राष्ट्रीय राजधानीत आंदोलन करण्यासाठी दिल्ली गाठण्याचे आवाहन केले. शेतकरी नेते सरवनसिंग पंढेर म्हणाले की, हे आंदोलन देशव्यापी करण्यासाठी संघटनांनी देशभरातील शेतकरी आणि मजुरांना ६ मार्च रोजी दिल्ली गाठण्याचे आणि १० मार्च रोजी देशभरातील रेल्वे गाड्या थांबविण्याचे आवाहन केले आहे.