मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू होती. आता आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत संजय पांडे यांनी गुरुवारी(दि.१९) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मीडियाला संबोधित करताना संजय पांडे म्हणाले की, त्यांना २००४ पासून काँग्रेसमध्ये यायचे होते, पण आता योग्य वेळ आली आहे.
यावेळी राज्यात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा संजय पांडे यांनी केला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर सर्वसामान्यांना घाबरण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. यावेळी महायुतीवर (एनडीए) टीका करताना त्यांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचेही म्हटले. दरम्यान, संजय पांडे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणत्या मतदारसंघातून संधी दिली जाते, हे पाहणे महत्वाचे आहे.