गडचिरोली : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा डाव पोलिसांच्या सी ६० जवानांच्या पथकांनी हाणून पाडला. पोलिस जवानांनी चार जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. गडचिरोलीच्या जंगलात आज पहाटे चारच्या सुमारास ही मोहीम पोलिस जवानांनी फत्ते केली. हे जहाल नक्षलवादी तेलंगणा राज्यातून प्राणहिता नदी ओलांडून घातपात घडवण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने नक्षलवादी तयारी करत होते. त्यासाठी तेलंगणा राज्य समितीच्या काही जहाल नक्षलवाद्यांनी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेली प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोली जिल्ह्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अहेरी उपपोलिस मुख्यालयातून सी-६० आणि सीआरपीएफ, क्यूएटीची अनेक
पथकं अतिरिक्त एसपी ऑपरेशन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जंगलात रवाना करण्यात आले.
पोलिस मदत केंद्र रेपनपल्लीपासून पाच किमी अंतरावरील कोलामार्काच्या जंगलामध्ये आज पहाटे शोध सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा शोध घेतला. यावेळी ४ नक्षलवाद्यांनी सी-६० दलांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर सी-६० पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर ४ जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिस जवानांना सापडले आहेत.