22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयमहागाई रोखण्यासाठी सरकारचा आटापीटा

महागाई रोखण्यासाठी सरकारचा आटापीटा

गव्हाच्या दरात वाढ गव्हाची आयात होण्याची शक्यता

नवी दिल्ली : सध्या गहू उत्पादक शेतक-यांना अच्छे दिन आले आहेत. कारण गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. सरकारने यावर्षी गव्हाचे विक्रमी उत्पादन झाल्याचा दावा केला आहे. मात्र, दुसरीकडे गहू आयात करण्याची शक्यता देखील वर्तवली जात असल्याने महागाई रोखण्यासाठी हा सरकारचा आटापीटा असल्याचे बोलल्या जात आहे. देशात नवीन सरकार स्थापन होताच गव्हाची आयात होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या वाढत्या किंमतीवर निंयत्रण ठेवण्यासाठी गहू आयातीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गव्हाची दरात सातत्याने वाढ होत आहे. सरकारी खरेदीची प्रक्रिया अद्याप संपलेली नाही आणि सध्या देशांतर्गत बाजारात गव्हाचा भाव २,४३५ रुपये प्रतिकिं्वटलवर पोहोचला आहे, जो वर्षभरापूर्वी याच वेळी २,२७७ रुपये होता. खुल्या बाजारात गव्हाचीकिंमत २,२७५ रुपये निश्चित केलेल्या किमान आधारभूतकिंमतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकार खरेदीच्या लक्ष्यापासून खूप दूर आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गव्हाची किरकोळ किंमत ३०.७१ रुपये प्रति किलो आहे, जी एका वर्षापूर्वी २९.१२ रुपये होती, तर पिठाची किंमत ३५.९३ रुपये प्रति किलो आहे, जी गेल्या वर्षी ३४.३८ रुपये होती. अशा परिस्थितीत गव्हाची वाढती महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार गव्हाच्या आयातीबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. नवीन सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच शून्य सीमाशुल्कावर गव्हाच्या आयातीला परवानगी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गव्हाची आयात होणार?
देशात ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्यानंकर नवीन सरकार स्थापन होईल. नवीन सरकार याबबातच निर्णय घेईल. सध्या देशातील गव्हाच्या किमती नवीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. सध्या सरकारने गव्हाच्या आयातीवर ४४ टक्के सीमाशुल्क लावले आहे. कोची, थुथुकुडी आणि कृष्णपट्टणम या दक्षिण भारतीय बंदरांमधूनच गहू आयात करण्याची परवानगी आहे. आता तब्बल सहा वर्षांनंतर गहू आयात होण्याची शक्यता आहे.

जागतिक स्तरावर गव्हाचे सर्वोच्च पातळीवर
जागतिक स्तरावर गव्हाचे भाव १० महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्नधान्याच्या किंमती नियंत्रणात आणायच्या असतील तर भारताला गहू आयात करावा लागेल, कारण ऑक्टोबरच्या आसपास मागणी-पुरवठा संतुलन बिघडू शकते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक बाजारपेठेत गव्हाच्या किंमती १० महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ आहेत.

यंदा विक्रमी उत्पादन?
कृषी मंत्रालयाने भारतात यावर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला होता. भारतातील गव्हाचे विक्रमी ११२१ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या भारतीय अन्न महामंडळाने ७५ लाख टन गव्हाचा साठा आहे. हा साठा गेल्या १६ वर्षातील सर्वात कमी साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाची खरेदी अधिक झाली आहे. यावर्षी उत्पादन जास्त आहे, परंतु वर्षाच्या उत्तरार्धात, विशेषत: ऑक्टोबरमध्ये जेव्हा साठा कमी असू शकतो तेव्हा त्यांना जास्त भाव मिळेल या आशेने शेतकरी त्यांच्या उत्पादनावर तग धरून आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR