डोंबिवली : प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली परिसरात सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन तासांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने दाणादाण उडाली आहे. कल्याणच्या पिसवली गावातील सुमारे २०० ते २५० घरांमध्ये पाणी शिरले आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरात सुरुवातीला पाऊस झाला आहे. मात्र आज सकाळपासून जोरदार पाऊस होत आहे. साधारण दोन तासांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून पावसामुळे कल्याण-डोंबिवलीतील रस्ते जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कल्याण पूर्वेकडील पिसवली गावातील दोनशे ते अडीचशे घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. या गावातील नाल्याचा प्रवाह संबंधित विकास कामांमुळे बदलल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे स्थानिकांनी सांगितले.
महापालिका प्रशासनाला याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मात्र प्रचंड हाल झाले. घरातील वस्तूंचे नुकसान झाले. सध्या महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पाहणी करत आहेत.